उत्तर प्रदेशात उत्कृष्ट कामगिरीनंतर ११ ते १५ जून दरम्यान काँग्रेसची ‘धन्यवाद यात्रा’

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तर प्रदेशमधील इंडिया ब्लॉकच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रोत्साहित झालेल्या काँग्रेसने 11 ते 15 जून या कालावधीत राज्यातील सर्व 403 मतदारसंघांमध्ये ‘धन्यवाद यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. या यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

यूपीमधील लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे उत्साही काँग्रेस पक्ष 11 जून ते 15 जून दरम्यान राज्यात आभार यात्रा काढणार आहे. याद्वारे पक्ष राज्यातील सर्व 403 विधानसभा जागांवर पोहोचून जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करेल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवेल. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी माध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले की, पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा आढावा घेतला. आम्ही 17 जागांवर लढलो आणि सहा जागा जिंकल्या. आम्ही युती म्हणून निवडणुकीत भाग घेतला आणि आमच्या युतीने राज्यात 43 जागा जिंकल्या.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनता आमच्याशी जोडली गेल्याचेही अविनाश पांडे यांनी म्हटलं आहे. देशाचे संविधान धोक्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील जनतेने आपली जबाबदारी चोख पार पाडली. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने व पदाधिकाऱ्याने साधनांची कमतरता असतानाही पूर्ण सहकार्य केले आणि मेहनत घेतली. त्यामुळे राज्यात नवा बदल झाला, असंही पांडे यावेळी म्हणाले. या बैठकीत आगामी काळातील जबाबदाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली तसेच 2027 च्या विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात आमचे सरकार नाही, पण शेतकऱ्यांवरील अन्याय आणि त्यांच्या शेतमालाच्या भावासाठी आम्ही लढणार आहोत, असंही पांडे यांनी यावेळी नमूद केलं.

Protected Content