पालिकेच्या प्रभागरचनेत गोंधळच गोंधळ; तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी कोर्टात जाणार    

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नगरपालिकेच्या प्रभाग रचना तयार करतांना शासनाच्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत अनेकांनी केलेल्या तक्रारीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनवाईत समाधान झाले नसून आपली भूमिका मांडण्यासाठी आम्ही कोर्टात जाणार असल्याचा पवित्रा सर्व तक्रारदारांनी घेतला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, ”नगरपालिकेच्या प्रभाग रचने संदर्भात शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या आरोपासह अनेकांनी तक्रार केली होती. यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनवाई झाली. मात्र आपण या सुनवाईवर समाधानी नसून याबाबत कोर्टात दाद मागणार असल्याचा पवित्रा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.”

या संदर्भात तक्रारदारांची नेमकी काय भूमिका आहे.

त्याची थोडक्यात मांडणी खालीलप्रमाणे –     

 

केवळ नावाला झाली सुनवाई – भाजपा

केवळ तक्रारदारांची दखल घेतली असं दाखविण्यासाठी, त्यांचं समाधान व्हावं या हेतूने नावाला हि सुनवाई झाल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष दिलीप महाजन आणि कन्हैय्या रायपूरकर यांनी केला. सत्ताधारींच्या दबावात प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप करत प्रभाग रचना बनविताना शासनाच्या आदेशाची अंमलबजावणीच झाली नसल्याचे सांगत हेच सांगण्यासाठी आम्ही कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.

प्रभाग रचना सदोष असल्या ठपका –

माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी ‘एकच सिटी सर्वे नंबरची अनेक घरे दोन वेगवेगळ्या प्रभागात दिसत असल्याचे सांगत मतदार नेमकं कुठे मतदान करतील ? असा प्रश्न उपस्थित करत प्रभाग रचना सदोष असल्या ठपका ठेवला आणि आपली हरकत दर्शविली.

धरणगाव जनमंचचा आक्षेप; अधिकाऱ्यांची बदलीची मागणी –         

ज्यांनी प्रभाग रचना केली आणि त्यावर आम्ही तक्रार केल्यावर पुन्हा तेच अधिकारी जर सुनवाई घेत असतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार ? असा प्रश्न धरणगाव जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी उपस्थित करत नगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांसह काही जणांवर आक्षेप घेतला. निवडणुका पारदर्शी होण्यासाठी आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काही अधिकाऱ्यांची बदलीची मागणी करणार असल्याचे धरणगाव जनमंचचे महाजन यांनी सांगितले.

मते फोडण्यासाठीची रचना; मुस्लीम प्रतिनिधींचा आरोप –

यावेळी मुस्लीम लोकप्रतिनिधींनी मुस्लीम नगरसेवक कमी करण्यासाठी षडयंत्र होत असल्याचा आरोप यावेळी केला. यासंदर्भात नगरसेवक अहमद पठाण, माजी नगरसेवक हाजी इब्राहीम, माजी नगरसेवक राजू शेख, नगर मोमिन, सैफुद्दीन शेख आदी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी, ‘शहरातील बेलदार मोहल्ला, पाताल नगरी यासह इतर मुस्लीम बहुल परिसराची दोन किंवा तीन प्रभागात मांडणी करण्यात आली असून मुद्धामच अशी रचना करत हे मुस्लीम मते फोडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी केला. मुस्लीम लोकसंख्येचा विचार करता चार मुस्लीम नगरसेवक निवडून येणे अपेक्षित असतांना मुस्लीम बहुल परिसर विभागल्यामुळे फक्त एक किंवा दोनच नगरसेवक निवडून येण्याची शक्यता याप्रसंगी मुस्लीम प्रतिनिधींनी व्यक्त करत या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.’

एकूणच नगरपालिकेच्या प्रभाग रचना तयार असताना शासनाच्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत अनेकांनी केलेल्या तक्रारीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनवाईत समाधान झाले नसून आपली भूमिका मांडण्यासाठी आम्ही कोर्टात जाणार असल्याचा पवित्रा सर्व तक्रारदारांनी घेतला आहे.

Protected Content