मुक्ताईनगरात एन्ट्री करतांना राष्ट्रीय महामार्गावर उडतोय गोंधळ; दिशादर्शक फलकाची मागणी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत मुक्ताई-चांगदेव माघवारी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई-नागपूर महामार्गावर श्रीक्षेत्र संत मुक्ताईनगरमध्ये प्रवेश करण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. माजी शिवसेना नगरसेवक संतोष सुपडू मराठे यांनी यासंदर्भात लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

मुक्ताईनगर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून आदिशक्ती श्री. संत मुक्ताई साहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही संत भूमी आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील चार प्रमुख धामांपैकी हे एक धाम असल्याने येथे दर पंधरवड्याला हजारो भाविक आणि पर्यटक येत असतात. त्यातच आगामी काळात संत मुक्ताई-चांगदेव माघवारी यात्रोत्सव आणि कुंभ पर्व सुरू असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

मुंबई-नागपूर महामार्गावर मुक्ताईनगर शहरात प्रवेश करण्यासाठी दिशादर्शक फलक नसल्याने अनेक भाविक वरणगाव किंवा घोडमगाव चिखलीपर्यंत पुढे निघून जातात, ज्यामुळे त्यांना नाहक त्रास होतो आणि वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भुसावळ आणि मलकापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी मराठे यांनी केली आहे.

Protected Content