जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी थेट नियंत्रण ठेवले आहे. या योजनेच्या दररोजच्या अंमलबजावणीचा आढावा व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात येत असून, आहार वितरणाच्या जिओ टॅगिंग केलेल्या सचित्र पुराव्याची मागणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांतर्गत आदिवासी क्षेत्रात चोपडा २, रावेर १, रावेर २ आणि यावल अशा चार प्रकल्पांत एकूण ११६ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये गरोदर व स्तनदा मातांना एक वेळचा पौष्टिक आहार, तसेच ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना दरमहा १६ दिवस अंडी किंवा केळी पुरवली जात आहेत.
प्रत्येक अंगणवाडीत गरोदर माता व बालकांच्या प्रत्यक्ष आहार सेवनाचे जिओ टॅग फोटोज दररोज व्हॉट्सऍप ग्रुपवर मागवले जात आहेत. या फोटोंच्या आधारे योजनेच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवून तातडीने सूचना दिल्या जात आहेत.
महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना नियमित सूचना व पाठपुरावा केला जात आहे.
या उपक्रमामुळे आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या पोषण स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.