जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी लढवू शकतात ग्रामपंचायत निवडणूक !

मुंबई । राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर २०२० रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल.

राज्य निवडणूक आयुक्तांच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

 

Protected Content