नाल्यात वाहून गेलेल्या ‘त्या” बालकाचा मृतदेह आढळला; कुटुंबियांचा प्रचंड आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खंडेराव नगरात नाल्यात चेंडी घेण्यासाठी उतरलेल्या सहा वर्षीय चिमुकला हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती. या मुलाचा मृतदेह रविवारी ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळील नाल्याजवळ अडकलेला आढळून आला. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्काम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन राहुल पवार (वय ६, रा.हरी विठ्ठल नगर, जळगाव) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरामध्ये शनिवारी दुपारी १ ते ५ या वेळेमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. खंडेराव नगर मध्ये असणारा मोठा नाला हा अनेक वर्षांपासून सुरक्षित नाही. या नाल्याजवळ काही मुले खेळत असताना त्यात सचिन राहुल पवार (वय ६) हा चेंडू घेण्यासाठी गेला असता नाल्यात वाहून गेला होता. यावेळी पोलिसांनी शोध मोहीम स्थानिक व मनपाच्या तरुणांच्या मदतीने सुरू केली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत यश न मिळाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते.

रविवारी ७ जुलै रोजी सकाळी पुन्हा नाल्याच्या परिसरात शोध कार्य सुरू करण्यात आले. यासाठी अग्निशमन दल, स्थानिक तरुण यांची मदत घेण्यात आली. अखेर सकाळी १० वाजेच्या सुमारास चिमुकला बालक सचिन पवार याचा मृतदेह पोहेकॉ जितेंद्र राजपूत, उमेश पवार यांच्या पथकाला आढळून आला आहे. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

शोधकार्यासाठी रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जितेंद्र राजपूत, इम्रान मलिक, उमेश पवार, निलेश पाटील, नाईक विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, अजय सपकाळे, कमलाकर राजहंस, जुलालसिंग परदेशी यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रवींद्र भोई, दीपक महाले, गोकुळ सुतार, जगदीश बैरागी, योगेश गालफाडे, सिताराम पवार, ज्ञानेश्वर भालेराव, दुर्गेश पवार, सुपडू माळी, भगवान माळी, महानगरपालिकेचे अधिकारी कांबळे आदींच्या पथकाने शोधकार्यात परिश्रम घेतले.

Protected Content