रक्षाबंधनाच्या दिवशीच भावावर काळाचा आघात

बोदवड प्रतिनिधी | रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडून राखी बांधून घरी निघालेल्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

काही तासांपूर्वी बहिणीकडून राखी बांधून आलेल्या खडका येथील रहिवासी ५५ वर्षीय भावाचा मुक्तळ ते सुरवाडा दरम्यान झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला.

जालमसिंग नयनसिंग चौधरी (वय ५५, रा. खडका, ता. भुसावळ ) हे रक्षाबंधनासाठी रविवारी सकाळी पत्नी कल्पना यांच्यासह मलकापूर येथील सासरवाडीला गेले होते. तेथे सासरे उमरावसिंग दशरथ पाटील यांच्याकडे पत्नीला सोडून ते मलकापूर जवळील घिर्णी बेलाड या गावी राहणार्‍या त्यांच्या बहिण मिराबाई फुलसिंग राजपूत यांच्याकडे गेले. तेथे मीराबाई यांनी भाऊ जालमसिंग यांना राखी बांधून पाहुणचार केला. त्यानंतर ते आपल्या एमएच.१९-एआर.७१६६ या क्रमांकाच्या दुचाकीने बोदवड येथे आले.

जालमसिंह पाटील यांचे शेत सुरवाडे शिवारात असल्याने ते घरी जाण्याआधी शेताकडे निघाले. तथापि, मुक्तळ ते सुरवाडे दरम्यान रस्त्यात त्यांची दुचाकी घसरून रस्त्याच्या कडेला पडली. त्यात चेहर्‍याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आहे. दरम्यान, रक्षाबंधनाच्याच दिवशी भावाचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content