मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाची युती राज्यातील तब्बल 14 महापालिकांमध्ये तुटल्याचे स्पष्ट झाले असून, या ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारीवरून मोठी धावपळ पाहायला मिळाली. काही नेत्यांना अपेक्षेप्रमाणे तिकीट मिळाले, तर काही ठिकाणी ऐनवेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने नाराजी उफाळून आली. काही शहरांत आयारामांना उमेदवारी देण्यात आल्याच्या आरोपांमुळे पक्षांतर्गत असंतोषही उघडपणे समोर आला.

स्थानिक राजकीय समीकरणे, जागावाटपातील ताणतणाव आणि नेतृत्वाच्या भूमिकांमुळे काही महापालिकांमध्ये भाजपा आणि शिंदे गटाने एकत्र येत युती कायम ठेवली, तर काही ठिकाणी मात्र ही युती पूर्णपणे तुटली. जागावाटपावरून महायुतीत मोठी रस्सीखेच झाली. काही शहरांत भाजपाने अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडला, तर काही ठिकाणी शिंदे गटाने युती न करण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 14 महापालिकांमध्ये भाजपा आणि शिंदे गटाची युती नसणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष थेट एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या शहरांतील लढती अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, युती तुटली असली तरी मुंबई आणि ठाणे या अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मात्र भाजपा आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी अजित पवार गटाला युतीत स्थान देण्यात आलेले नाही, हेही विशेष मानले जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिका भाजपा, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत.
राज्यातील सर्व महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होतील. काही ठिकाणी महायुती कायम, तर काही ठिकाणी युती तुटलेली असल्याने मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
एकूणच भाजपा आणि शिंदे गटातील ही फूट महापालिका निवडणुकांचे गणित बदलणारी ठरणार असून, 14 महापालिकांतील थेट लढतींचा निकाल राज्याच्या पुढील राजकीय दिशेचे संकेत देणारा ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.



