अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले; दोन तरूण जागीच ठार

भुसावळ प्रतिनिधी । शहरातल्या नाहाटा कॉलेजवळच्या उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविल्याने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला असून वाहनचालक फरार झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, नाहाटा कॉलेज जवळचा उड्डाण पुल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी याच्या एका बाजूचे काम अद्यापही सुरू आहे. यामुळे फक्त एकाच बाजूने वाहतुक सुरू आहे. रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून जाणार्‍या दोन जणांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात ते दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, यामुळे दुचाकीचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. तर अज्ञात वाहन चालक हा घटनास्थळावरून आपले वाहन घेऊन फरार झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक पिंटू कोठारी आणि पिंटू ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांचे पार्थिव रूग्णालयाकडे रवाना करण्यासाठी मदत केली. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठीही त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह मदत केली. तर बाजारपेठचे पोलीस निरिक्षक आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये शेख शरीफ शेख इद्रीस (वय २५) आणि अलाउद्दीन बशीरउद्दीन (वय २४, दोन्ही राहणार ग्रीन पार्क, भुसावळ) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या आप्तांनी घटनास्थळी प्रचंड आक्रोश केला. दोन्हींचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. फ्लायओव्हरवर सुरू असणारे काम आणि पथदिवे न लावल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप परिसरातून करण्यात येत असून संबंधीत कंपनीने याची दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

Protected Content