पावसाळ्यात वीज उपकरणापासून सावधगिरी बाळगावी; महावितरणचे ग्राहकांना आवाहन

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या विजेचा धोका लक्षात घेता ,या काळात वीज यंत्रणेपासून तसेच घरगुती वीज उपकरणापांसून सावधगिरी बाळगली तर होणारे वीज अपघात टाळता येणे शक्य आहे.असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, विजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने कधीकधी वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास वीज ग्राहकांनी जवळच्या महावितरण कार्यालयाला अवगत करावे.

शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरु असणार्‍या महावितरणचे सनियंत्रण कक्षातील ७८७५७६३३३९ भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून ते रोहित्र किंवा त्या फिडरचा वीजपुरवठा तात्पूरता बंद करण्यात येतो.परिस्थिती सुस्थितीत होताच वीज पुरवठा सुरळीत करण्यात येतो.त्यामुळे अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत, त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content