चाळीसगाव (दिलीप घोरपडे )
येथील पिर मुसा कादरी (बामोशी बाबा) बाबांच्या उर्साला उद्यापासून (दि.२२) सुरुवात होत आहे. हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतिक असलेल्या या उरूसमध्ये राज्यासह देशाच्या विविध भागातील भाविक सहभागी होत असतात. पहिल्या दिवशी म्हणजेच २२ मार्च रोजी मुस्लिम बांधवांच्या घरातून संदल निघेल तर २३ मार्च रोजी हिंदू देशमुखांच्या घरून तलवार मिरवणूक निघते या दोन्हीही मिरवणुकीत हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्रित सहभागी होतात. यामुळे हा उरुस अत्यंत शांतता आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतो, ही चाळीसगाव शहराची अनेक वर्षांची परंपरा आहे.
या दर्ग्याबाबत असलेली आख्यायिका आणि इतिहास असा आहे की, अंदाजे साडेसातशे वर्षापूर्वीची सुफी संत पीर मुसा कादरी बाबा उपाख्य बामोशी बाबा यांची डोंगरी नदीच्या किनारी मजार आहे देशभरातून लाखो भाविक या सुफी संताच्या दर्शनाकरीता येतात कुणाच्या लेखी बाबा सुफी संत होते तर कुणी म्हणत ते नाथपंथीय योगी देखील होते. अनेक अख्यायिका असल्या तरी त्यापैकी प्रचलित अख्यायिका म्हणजे चाळीसगाव शहर व आसपासचा परिसर देशमुख कुटूंबाची जहागिरी होता. घरातला कर्ता पुरूष लढाईत पडला की, जहागिरी बळाकावण्यासाठी त्यांचे शत्रु सतत प्रयत्न करीत असत. देशमुखांच्या जहागिरीत सततच्या लढाया सुरू झाल्या, जहागिरीचे वारस धनाजी देशमुख लहान होते त्यांच्या आई चोपडा जि.जळगाव येथील देशमुख घराण्यातल्या होत्या त्यांचे गुरू पीर मुसा कादरी बाबा यांना बाईंनी मदतीसाठी बोलावले बाबांचे वास्तव्य ब-हाणपुर चोपडा परिसरात असे. पुर्वाश्रमीचे अरब योध्दे असलेल्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली धनाजी देशमुखांनी शत्रुचा पराजय केला चाळीसगावची आपली जहागिरी स्थिरस्थावर केली. तेव्हापासुन चाळीसगावी डोंगरी नदीकिनारच्या चिंचेच्या गर्द झाडीत बाबांचे वास्तव्य होते. देवाची करूणा भाकत हा सुफी संत लोकांना आशिर्वाद देई. पुढे इथेच बाबांची मजार आणि त्यावर दर्गा तयार झाला. निर्वाणापुर्वी आपल्या जवळची तलवार त्यांनी धनाजी देशमुखांना दिली व आशिर्वाद दिला तेव्हापासुन देशमुख वाड्यातल्या तलवारीच्या खोलीत ही तलवार असते व प्रत्येक उरूसाच्या वेळी वाजत गाजत लाखो भाविकांसह मिरवणुकीनं ती दर्ग्यात नेली जाते. संबंध भारतात आणि भारताबाहेर या स्थानाला मानणारे भाविक आहेत. हिंदु-मुस्लिम एकतेच प्रतिक म्हणुन हा दर्गा प्रसिध्द आहे.
सर्वात लवकर बातमी चाळीसगावात फक़्त आबासाहेबान्कडून