जळगाव प्रतिनिधी । अपघाताचे प्रमाण संपूर्णता रोखण्यासाठी व ध्वनिप्रदुषण कमी करण्यासाठी हॉर्नचा वापर न करणे तसेच वाहन चालवतांना जबाबदारीचे भान ठेवणे, यासाठी महावाकथॉनच्या माध्यमातून राज्यभरात प्रबोधन मोहिम राबविण्यात आली. या प्रबोधन मोहिमेत सहभागी झाल्या बद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र मोटर वाहतूक विभाग, कॅसी ग्लोबल आणि सीएसआर डायरी यांच्यातर्फे महावाकथॉनच्या माध्यमातून राज्यभरात प्रबोधन जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली. या महावाकथॉनच्या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन प्रभावीपणे प्रबोधन केल्याने कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांचा संयोजकांतर्फे “कम्युनिटी लिडरचा पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.
कॅसी ग्लोबलचे संचालक मितेझ शेठ आणि व्यवस्थापिका साक्षी पहुजा यांनी विद्यापीठात येऊन कुलगुरु प्रा.पाटील यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी प्रभारी कुलसचिव, प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, प्राचार्य एल.पी.देशमुख उपस्थित होते. महावाकथॉनची ही जनजागृती मोहिम एकाच दिवसी व एकाचवेळी ५०३ ठिकाणी राबविण्यात आली. यात एकूण पाच लाख सात हजार ३६७ युवक-युवती आणि नागरिकांनी सहभाग घेतला. सहभागी युवक-युवती आणि नागरिकांनी रस्ता सुरक्षा, ध्वनिप्रदुषण यासंदर्भात जनजागृती केली.