औरंगाबाद वृत्तसंस्था । अयोध्येतील राम मंदिर प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही दिवसांतच लागणार असून या निकालानंतर शहरातील शांतता बिघडू नये, यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सोशय मीडियावरून निकालाच्या आधी किंवा नंतर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
सर्वोच्च न्यायलयाकडून काही दिवसांतच अयोध्या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या अशा या निर्णयानंतर समाजात तेढ निर्माण होऊ नये, तसेच कोणत्याही असमाजिक तत्त्वांकडून शहराची शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. तसेच निकालासंबंधात कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यास पोस्टसंदर्भात ग्रुप अॅडमीनसह ग्रुपच्या संबंधित सदस्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. असे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शहरात शांतता ठेवण्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय एक सीआरपीएफची टीम आणि एक एसआरपीएफची टीम शहरात बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे. याशिवाय विविध कॉर्नरसह काही महत्त्वाच्या पॉईंट येथे पोलिस दलाची एक तुकडी तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय सोशल मीडियावरून विशिष्ट धर्माच्या बाबत किंवा निर्णयाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्हॉटस अप किंवा अन्य सोशल मीडियावरील ग्रुपच्या अॅडमीन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा ग्रुपच्या हालचालींवर सायबर सेलच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत असल्याची माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली.