नवी दिल्ली (वृत्तसेवा) एक्झिट पोलच्या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. ही निराशा झटकण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. निकालास अवघे काही तास उरले असतांना ट्विट करून काँग्रेस कार्यकर्त्यांना घाबरून न जाण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
‘आगामी २४ तास खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे सतर्क आणि दक्ष रहा. घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या प्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमचे श्रम वाया जाणार नाहीत,’ असं राहुल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रियांका यांनीही अफवा आणि एक्झिट पोलवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं होतं. स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसण्याच्या सूचनाही प्रियांका यांनी कार्यकर्त्यांना केल्या होत्या.