मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेच्या १२ आमदारांची तीव्र नाराजी

udhdhav thakaray

मुंबई, वृत्तसंस्था | ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला एक महिन्याने मुहूर्त लाभला असला तरी या विस्तारानंतर शिवसेनेत तीव्र नाराजी पसरल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या १२ नाराज आमदारांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे. नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आहे.

 

सगळे नाराज आमदार लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या आमदारांनी अजून उद्धव ठाकरेंची वेळ घेतलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारात शरद पवारांनी हस्तक्षेप केल्याने डावलले गेल्याची भावना अनेक शिवसेना आमदारांमध्ये असल्याची कुजबूज आहे. याशिवाय मंत्रिमंडळातील सगळी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेल्यानेही आमदारांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी संजय राऊत गैरहजर होते. त्यामुळे संजय राऊतही नाराज आहेत अशी चर्चा आहे. सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. मात्र संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, भास्कर जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी या आमदारांनी त्यांची नाराजी मात्र उघडपणे बोलून दाखवली आहे.

Protected Content