सोनियांशी भेटीनंतर काँग्रेस राज्यात शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता धूसर

sonia Gandhi 1513392988

पूर्व आणि निवडणुकीनंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. मात्र सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जायचे की नाही ? याबाबत बोलण्यास काँग्रेसच्या या शिष्टमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवसेनेबरोबर काँग्रेस जाणार की नाही ? याबाबतचे गुढ वाढले आहे. मात्र ही शक्यता धूसर झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

 

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज दिल्लीत दाखल झाले होते. या शिष्टमंडळाला संध्याकाळी उशिरा सोनिया गांधींची भेट मिळाली. या नेत्यांनी तब्बल अर्धा तास सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसार माध्यमांना बाळासाहेब थोरात यांनी या चर्चेचा तपशील दिला. सोनिया गांधी यांना राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाची, निसटत्या मतांनी झालेल्या पराभवाची, मत विभागणीची आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. इतर विषयांवर त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचे थोरात यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत सोनिया गांधी यांनी परवानगी दिलीय का ? या प्रश्नावर बोलण्यास थोरात यांनी नकार दिला. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममुळे बसलेल्या फटक्याची माहिती सोनिया गांधींना दिल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यांनीही शिवसेनेबरोबरच्या संभाव्य युतीवर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता.

दरम्यान, या भेटीत राष्ट्रवादीची शिवसेनेबाबतची असलेली भूमिका या नेत्यांनी सोनिया गांधींना अवगत करून दिल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन नाही झाले तर कोणती भूमिका घ्यायची ? शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणे कितपत योग्य ठरेल ? याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीची साथ मिळाली तरी शिवसेनेचं मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येते. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेसोबत जाण्याबाबत भाष्य करण्यास काँग्रेस नेत्यांनी नकार दिला. याचाच अर्थ सोनिया यांनी शिवसेनेसोबत जाण्यास परवानगी दिली नसल्याचे अधोरेखित होत आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत आता भाजप ताठर भूमिका घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकट्या राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सत्ता स्थापन करू शकत नसल्याने शिवसेनेला भाजपबरोबर जाणे भागच आहे. त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची मागणी सोडावी लागू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Protected Content