तलसारी- वृत्तसेवा । प्रसिद्ध बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी यांच्या अचानक झालेल्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. ओडिशातील तलसारी किनाऱ्यावर मालिकेच्या शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, चित्रीकरणासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘भोले बाबा पार करेगा’ या मालिकेच्या शूटिंगसाठी राहुल तलसारी येथे उपस्थित होते. शूटिंगदरम्यान एका सीनसाठी ते समुद्रात उतरले होते. मात्र काही वेळातच ते पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या क्रू सदस्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना बाहेर काढले, परंतु तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यांना तातडीने दीघा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वयाच्या अवघ्या ४३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

या घटनेनंतर तलसारी मरीन पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटिंगपूर्वी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच स्थानिक पोलिस ठाण्यालाही चित्रीकरणाबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण ‘अनैसर्गिक मृत्यू’ म्हणून नोंदवण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राहुल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रियांका सरकार यांनी भावनिक निवेदन जारी करत कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या कठीण काळात माध्यमांनी संवेदनशीलता दाखवावी, अशी विनंती करत कुटुंबाला शांततेत दु:ख व्यक्त करण्याची संधी द्यावी, असे नमूद केले आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांमध्ये शोकाची भावना असून, सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे.
घटनेच्या प्राथमिक अंदाजानुसार, समुद्रातील जोरदार लाटा किंवा पाण्याची अचानक वाढलेली खोली यामुळे राहुल यांचा तोल गेला असावा. सुरुवातीला परिस्थिती गंभीर होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. मात्र ते बराच वेळ बाहेर न आल्याने क्रू सदस्यांना संशय आला आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. ही घटना मनोरंजन क्षेत्रातील सुरक्षेच्या नियमांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.



