जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ जामनेर दरम्यान गारखेडा शिवारात गंगापुरी जवळ भुसावळहून जामनेर साठी येणाऱ्या रिक्षा व जामनेर होऊन भुसावळ कडे जाणाऱ्या मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून यात तीन जण ठार तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

सदरची घटना अंदाजे सात वाजल्याच्या सुमारास घडली. यात मिक्सर ट्रक क्रमांक एम एच 19 सी एक्स 2181 या गाडीने पियाजो रिक्षा क्रमांक एम एच 19 व्ही 3704 ला जबरदस्त धडक दिली. रिक्षात एकूण आठ प्रवासी बसलेले होते त्यापैकी निकिता गोपाल निंबाळकर (राहणार चिंचखेडा बुद्रुक अंदाजे वय 20 ) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (तळेगाव वय 32) यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी मयत घोषित केले.

तर जयेश गोपाल निंबाळकर वय 16 राहणार चिंचखेडा; सरला गोपाळ निंबाळकर वय 39 राहणार चिंचखेडा; योगेश विठ्ठल गायकवाड राहणार चिंचखेडा वय 45 ; सुरेश विलास कापडे राहणार संभाजीनगर वय 50; अखिलेश कुमार राहणार उत्तर प्रदेश वय 50; संगीता सुभाष चौधरी संभाजीनगर वय 50 हे गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना तात्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. यापैकी सरला गोपाळ निंबाळकर वय 39 राहणार चिंचखेडा यांचा जळगाव साठी उपचारासाठी नेत असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला. मागील महिन्यातच जामनेर पौर दरम्यान मोटरसायकल व पिकअप गाडीचा अपघात होऊन चार तरुणांचा मृत्यू झाला होता. या नंतर आता आज भीषण अपघात होऊन तिघांचे बळी गेले आहेत.



