शेतातील बांधावर लावलेल्या जाळीवरून तरूणाला चौघांकडून मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील रामपेठ येथे शेतातील बांधावर लावलेल्या जाळीवरून वाद होवून एका तरूणाला चौघांनी लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील रामपेठ येथे सागर ईश्वर धनगर वय २७ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतातील बांधावर लावलेल्या जाळीवरून गावात राहणारे हरचंद देवचंद धनगर यांच्याशी १६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता वाद झाला. या रागातून हरचंद देवचंद धनगर, समाधान हरचंद धनगर, अनिल हरचंद धनगर आणि सुनिल हरचंद धनगर सर्व रा. रामपेठ, वरणगाव या चौघांनी सागर धनगर याला शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या सागरला रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सागरची आई यशोदा ईश्वर धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरचंद देवचंद धनगर, समाधान हरचंद धनगर, अनिल हरचंद धनगर आणि सुनिल हरचंद धनगर सर्व रा. रामपेठ, वरणगाव याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ यासीन पिंजारी हे करीत आहे.

Protected Content