जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी लोहारा गावातून जळगावकडे येत असलेल्या रिक्षाला कुसुंबाजवळ ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत रिक्षातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता घडली. या घटनेत रिक्षातील दोन जण ही जखमी झाले आहेत. या प्रकरणी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाबाई गणेश हिवाये (वय ४०, रा.लोहारा, पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे.
अधिक असे की, रत्नाबाई हिवाये या लोहारा येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावातून भाजीपाला खरेदी करुन, त्या लोहारा येथे भाजीपाला विक्री करत. मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे त्या गावातील रिक्षातून जळगाव बाजार समितीकडे येत होत्या. कुसूंबा गावाच्या पुढे एका ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिलेल्या धडकेत, रिक्षा पलटी झाली. त्यानंतर रिक्षातून रत्नाबाई या दुर फेकल्या गेल्या. त्या थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशा दर्शक फलकाला जावून आदळल्या. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचालक बापू भास्कर चौधरी (वय ३०, रा.लोहारा) व गणेश बाबूलाल जाधव (वय २८, रा.रोटवद तांडा) हे दोन जण जखमी झाले. दोघांवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक ट्रॅव्हल्स घेऊन पुढे निघून गेला. एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चालकाला सिंधी कॉलनीतून ट्रॅव्हल्ससह ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणी रिक्षा चालक बापू चौधरी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात मयत असलेल्या रत्नाबाई हिवाये यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.