महामार्गावर ट्रक पेटविणाऱ्या १९ जणांवर गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे जनावरांचे चामडे व हाडे घेवून जाणाऱ्या ट्रक जाळल्याची घटना गुरूवारी घडली होती. प्रकरणी शुक्रवार १८ ऑगस्ट रोजी दुपारी धरणगाव पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार, १७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथून मालवाहू ट्रक (क्र. युपी ९३, एटी ८१३५) हा जनावरांची कातडे भरुन ट्रक चालक सल्लू खान बाबू खान व क्लिनर मानसिंग श्रीराम कुशवाह हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथे लेदर फॅक्टरी येथे प्रक्रियेकरीता घेवून जात होते. त्यावेळी धरणगाव तालुक्यातील बांभोरी जवळ काही जणांनी ट्रकचा पाठलाग करुन पाळधी येथे थांबवून जमाव जमविला होता. पोलिसांनी जमावाला कायदा हातात न घेता कायदेशीर कारवाई करण्याविषयीचे आवाहन केले होते. तसेच पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून सदर ट्रकमधील कातड्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविले.

त्या ठिकाणी काही जणांनी पोलिसांवर दगडफेक करून पोलिस वाहनांची तोडफोड केली तसेच ट्रक चालक व क्लिनर यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच मालवाहू ट्रक पेटवून दिला. त्यावेळी पोलिसांनी ट्रक चालक व क्लिनरचा जीव वाचवून अग्नीशमन दलाच्या मदतीने ट्रक विझविला. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून १९ जणांवर गुन्हा दाखलकरण्यात आला. यात अक्षय तंटू अहिरे, भुषण पावबा पाटील, मयुर अनिल पाटील, जनार्दन गुलाब सोनवणे, विकास राजेंद्र सोनवणे, रामेश्वर भगवान माळी, सोपान कोळी, पंकज लोटन चौधरी, रत्नदिप मनोज नन्नवरे, सुशील संजय नन्नवरे, सागर जितेंद्र नन्नवरे, रूपेश प्रभाकर माळी, गोपाल सुरेश चौधरी, भगवान सोमनाथ पाटील, समाधान चेतन कोळी सर्व रा. पाळधी ता.धरणगाव, धिरज कोळी, गुलाबर नन्नवरे, सोपान नन्नवरे, प्रमोद युवरात कोळी सर्व रा. बांभोरी ता.धरणगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content