पाचोरा (नंदु शेलकर) । आमदारांनी शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम सोडून द्यावे, ही नौटंकी न करता त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे असा खोचक सल्ला भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सोमवारी आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकी संदर्भात आमदार पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिलेल्या सुचनेवरून भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आज पत्रकार परिषदे घेतली त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या ११ महिन्यांपासून वेळोवेळी ट्रान्सफार्मर खराब होऊन ते तात्काळ दुरुस्त करून दिले जात नाहीत तसेच त्यासाठी लागणारे ऑइल व इतर सामुग्री देखील महावितरणाकडे उपलब्ध नसल्याचे कारण नेहमी संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. ही अडचण गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शेतकरी व सामान्य नागरिकांना सहन करावी लागत असून त्यांना याचा गंभीर परिणाम सोसावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिकांनी आमच्यापर्यंत संबंधित विभागाच्या व त्यातील अधिकाऱ्यांच्या तक्रारी करून त्यांना येणाऱ्या अडचणी आमच्यापर्यंत मांडल्या, याविषयी स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून त्यांना भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदने देखील देण्यात आले आहेत. तसेच बऱ्याचदा अधिकाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क करून देखील स्थानिक अधिकाऱ्यांनी कुठलीही उपाययोजना किंवा पर्यायी मार्ग यातुन काढला नाही. त्यामुळे पाचोरा व भडगाव या तालुक्यांना आमदार आहेत की नाही ? असा संभ्रम जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे आमदारांनी नौटंकी बंद करावी व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे असा घणाघात भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दि. २९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
राज्यात सरकार त्यांचे आहे. मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे आहेत परंतु त्यांच्या अकार्यक्षमतेचा परिणाम या पाचोरा व भडगाव तालुक्यातील जनतेला सोसावा लागत आहे. अशी घणाघाती टिका यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली. भडगाव तालुक्यातील कोठली येथील १३२ के.व्ही.चे उपविद्युत केंद्र जवळपास पूर्णत्वास येत आहे. परंतु त्या उपविद्युत केंद्रासाठी विद्युत पुरवठा प्रलंबित असुन त्याबाबत कुठलाही निर्णय आजपावेतो झालेला नाही.
तसेच राज्य शासनाने त्वरीत पाचोरा – भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे काम करावे. परंतु आमदारांनी यासंदर्भात फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांची बोळवण केली. राज्यात त्यांची सत्ता असून मुख्यमंत्री व कृषिमंत्री त्यांच्या पक्षाचे असतांना देखील आमदारांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यांनी फक्त सर्व सामान्यांच्या समस्यांबाबत नौटंकी लावलेली थांबवावी व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2378597899100963/