यवतमाळ (वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी यवतमाळमधील पांढरकवडा येथे “मोदी गो बॅक” अशी फलके झळकत असल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 2014 मध्ये मोदी याच मतदार संघातील दाभडी गावात आले होते, तेथून त्यांनी “चाय पे चर्चा” कार्यक्रमातून देशातील शेतकऱ्यांना आश्वासने दिली होती, मात्र ती पाळली नाही, त्या निषेधार्थ हे फलक लावले असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी महाराष्ट्राच्या दौ-यावर येत असून त्यांच्या हस्ते विदर्भ आणि खान्देशात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते एकलव्य मॉडेल स्कूलचे उद्घाटन होणार आहे. तसेच प्रधानमंत्री गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात येतील. अजनी (नागपूर) ते पुणे रेल्वेचा ई-शुभारंभ, ग्रामोन्नती योजनेतील लाभार्र्थींना धनादेशाचे वाटप होणार आहे. त्यानंतर ते बचतगटांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते धुळ्याकडे रवाना होतील. लोअर पांझरा मध्यम प्रकल्पाचे उद्घाटन, सुळवडे-जांफळ उपसा सिंचन योजना, धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजना, धुळे-नारदा रेल्वे व जळगाव-मनमाड या रेल्वारील तिस-या लाईने भूमीपूजन होणार आहे.