
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुंड गावात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत घोडसगाव अंतर्गत येणाऱ्या कुंड गावातील सार्वजनिक जागा, रस्ते आणि मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे गावातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील काही ठिकाणी रस्ते अरुंद झाल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक जागांवर वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे गावाच्या नियोजनावरही परिणाम होत असून भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुंड गावातील भीमराव हिरोळे, ब्रिजलाल इंगळे, नारायण तायडे, गोलू कवडे, विजय रायपुरे, संजय ठाकरे, अरुण जाधव, रोशन कचरे, भूषण कचरे, नामदेव कवडे, सुकलाल कवडे, विलास कवडे, जगदेव बाविसाने, राजू वानखेडे, किरण वानखेडे, मिलिंद वानखेडे, सुपडा हिरोळे, भीमराव पालवे आणि मिलिंद जाधव आदींच्या नावांची गावात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी तसेच सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अतिक्रमणामुळे भविष्यात गावातील विकासकामांवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.



