जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून सभापती सुनील महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या विरोधात १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

आठ महिन्यांतच सत्ता गमावली
गेल्या वर्षी २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर सुनील महाजन यांनी सभापतीपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यावेळी श्यामकांत सोनवणे यांना पदावरून दूर करत महाजन यांनी सत्ता स्थापन केली होती. मात्र अवघ्या आठ महिन्यांतच त्यांच्यावर अविश्वासाची वेळ आल्याने त्यांना पद सोडावे लागले.
१२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव
सोमवारी बाजार समितीतील १८ पैकी १२ संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन महाजन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या गटात श्यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील, मनोज चौधरी, पल्लवी देशमुख यांसारख्या प्रमुख संचालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काही संचालकही विरोधी गटात गेल्याने राजकीय समीकरणे अचानक बदलली.
विशेष सभेपूर्वीच निर्णय
अविश्वास प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सभा बोलावली जाणार होती. या सभेत बहुमत सिद्ध करण्याचे मोठे आव्हान महाजन यांच्यासमोर होते. मात्र विरोधी गटाकडे स्पष्ट बहुमत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदानाला सामोरे जाण्याऐवजी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
नव्या सभापतीबाबत उत्सुकता
महाजन यांच्या राजीनाम्यानंतर आता बाजार समितीच्या पुढील नेतृत्वाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. श्यामकांत सोनवणे यांचे पुनरागमन होणार की एखादा नवा चेहरा पुढे येणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत. या घडामोडींमुळे जळगावच्या सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.



