Home Cities जळगाव माहुली संगम येथील ऐतिहासिक स्मृतीस्थळांच्या सुशोभीकरणाला गती देण्याची मागणी

माहुली संगम येथील ऐतिहासिक स्मृतीस्थळांच्या सुशोभीकरणाला गती देण्याची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माहुली संगम येथील छत्रपतीकालीन ऐतिहासिक स्मृतीस्थळांच्या सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, या कामाला तातडीने गती देण्याची मागणी पुढे येत आहे. महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि धोरले शाहू महाराज यांच्या स्मृतिस्थळांच्या जतन व विकासासाठी करण्यात येणाऱ्या या उपक्रमाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी मांडलेल्या संकल्पनेतून माहुली संगम येथील दक्षिणकालीन पवित्र परिसरात असलेल्या या स्मृतीस्थळांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने मोठ्या निधीची तरतूद केली असून, या ठिकाणांच्या संवर्धनाद्वारे मराठा इतिहासातील अमूल्य वारसा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. या स्मृतीस्थळांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभले असून, देश-विदेशातील शिवप्रेमींसाठी ते प्रेरणास्थान ठरणार आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित कामांना वेग देण्यासाठी ना. श्रीश्री शिवेंद्रराजेसाहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये या स्मारकांचे काम लवकर पूर्ण व्हावे, परिसराचे सुशोभीकरण दर्जेदार पद्धतीने व्हावे आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होऊन पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक वारशाचे जतन हे केवळ भावनिक नव्हे तर सांस्कृतिक कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करत, शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. स्मृतीस्थळांचे सुशोभीकरण पूर्ण झाल्यास भावी पिढ्यांना मराठा इतिहासाची ओळख अधिक प्रभावीपणे होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

निवेदनकर्ते अशोक शेषराव शिंदे यांनी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करत या कामाला गती देण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे. “जय जिजाऊ, जय शिवराय” या घोषणेसह त्यांनी या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound