जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गौमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा द्यावा, देशातील कत्तलखाने बंद करावेत आणि गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या विविध मागण्यांसाठी जामनेर येथे वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार मोर्चा काढून सोमवार, २७ ,एप्रिल रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनामुळे शहरात धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, मोठ्या संख्येने संत, वारकरी आणि हिंदू बांधव सहभागी झाल्याने या मोर्चाकडे विशेष लक्ष वेधले गेले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करत वारकरी संप्रदाय, गौरक्षक आणि हिंदू समाजातील नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन सादर केले. या निवेदनातून गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याबरोबरच देशातील कत्तलखान्यांवर बंदी घालण्याची आणि गोसंरक्षणासाठी कठोर धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी गोमातेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करत गौसंरक्षणासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी वारकरी संप्रदायाबद्दल करण्यात आलेल्या कथित अपशब्दांच्या निषेधार्थही संत आणि वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वारकरी परंपरा आणि संतसंस्कृतीचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या मागण्यांसह सामाजिक सलोखा आणि धार्मिक मूल्यांच्या जतनासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मोर्चात श्याम चैतन्य महाराज, आत्मनंद गिरीजी महाराज, लखनजी महाराज, कृष्णा महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक संत उपस्थित होते. सकल हिंदू समाजातील बांधव, गौरक्षक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. संतांच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाला अधिक धार मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आंदोलनादरम्यान गौसंरक्षणाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शासनाने जनभावनांचा आदर करत गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा जाहीर करावा, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. निवेदनाद्वारे शासनापर्यंत भावना पोहोचविण्याचा प्रयत्न करत पुढील काळातही या मागणीसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनामुळे जामनेरमध्ये धार्मिक आणि सामाजिक प्रश्न पुन्हा चर्चेत आले असून, गौसंरक्षणाच्या मुद्द्यावर जनभावना तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने या मागण्यांवर काय भूमिका घेतली, याकडे आता आंदोलनकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.



