यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश मिळाल्याचा दावा करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मधुकर सहकारी साखर कारखाना, न्हावी (फैजपूर) संदर्भातील प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांनी दिली.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना पिंटू राणे यांनी गेल्या दहा वर्षांपासून कृती समितीच्या माध्यमातून हा लढा उभारण्यात आल्याचे सांगितले. कारखान्याशी संबंधित विविध अडचणी, उस उत्पादकांचे प्रलंबित प्रश्न आणि आर्थिक बाबींवर सातत्याने आवाज उठविण्यात आला. या लढ्यामुळे संबंधित यंत्रणांना निर्णय घ्यावा लागला आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लागल्याचा दावा त्यांनी केला.

या बैठकीला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, उपसभापती दिपक चौधरी, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिपक अण्णा पाटील तसेच शेतकरी हितासाठी कार्यरत गिरीष कोळंबे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.



