चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “माझ्याशी लग्न का करत नाहीस?” असा जाब विचारत एका तरुणीचा विनयभंग करून तिचे सेल्फी फोटो व्हायरल करत तिचे ठरलेले लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह त्याच्या तीन नातेवाइकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी ही चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असून मुख्य संशयित आरोपी निलेश राजेंद्र थोरात याने २० डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या वेळी पिडीत तरुणीला तिच्या आजीच्या घराच्या गच्चीवर बोलावले. तिथे त्याने तिला बळजबरीने जवळ ओढून “माझ्याशी लग्न करशील का?” अशी विचारणा केली. तरुणीने नकार दिला असता, त्याने तिच्यासोबत सेल्फी फोटो काढले.

संशयित आरोपी निलेश थोरात याने हे फोटो अमोल जाधव नावाच्या व्यक्तीला दाखवले आणि तरुणीची बदनामी केली. या बदनामीमुळे पिडीत तरुणीचे ठरलेले लग्न मोडले गेले. इतक्यावरच न थांबता, जेव्हा तरुणीच्या काकांनी विचारणा केली, तेव्हा आरोपी निलेश आणि त्याच्यासोबत असलेल्या मामा संजय पवार, सोमनाथ पवार आणि जयश्री पवार यांनी तरुणीचे लग्न इतर कुठेही होऊ देणार नाही, अशी धमकी दिली.
या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर १८ वर्षीय तरुणीने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संशयित आरोपी निलेश राजेंद्र थोरात, संजय दशरथ पवार, सोमनाथ दशरथ पवार, जयश्री संजय पवार सर्व रा. नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.



