
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आजच्या तंत्रज्ञानप्रधान आणि वेगवान जीवनशैलीत मानवासमोर उभ्या राहणाऱ्या नैतिक आव्हानांवर भारतीय तत्त्वज्ञान प्रभावी उत्तर देऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत अलाहाबाद विद्यापीठाचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रो. डॉ. ऋषीकांत पांडे यांनी भारतीय विचारपरंपरेची समकालीन उपयुक्तता अधोरेखित केली. आधुनिक समाजातील नैतिक संभ्रम, मूल्यांची गळती आणि मानवी नात्यांतील ताण यावर भारतीय दर्शनांतील नीतिशास्त्र आजही मार्गदर्शक ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे ‘भारतीय तत्त्वज्ञान आणि समकालीन नैतिक आव्हाने’ या विषयावर शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय तत्त्वज्ञान परिषद (ICPR), नवी दिल्ली यांच्या सहकार्याने आयोजित या चर्चासत्रात देशभरातील नामवंत अभ्यासक, प्राध्यापक आणि संशोधकांनी सहभाग घेत वैचारिक मंथन घडवून आणले.
बीजभाषणात प्रो. डॉ. ऋषीकांत पांडे यांनी वेद, उपनिषदे, बौद्ध व जैन दर्शनातील नीतिमूल्ये आजच्या सामाजिक, राजकीय आणि तांत्रिक प्रश्नांशी कशी सुसंगत आहेत, याचे सविस्तर विवेचन केले. मानवी जीवनात करुणा, सत्य, अहिंसा आणि कर्तव्यभावना या मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी भारतीय तत्त्वज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे त्यांनी नमूद केले.
चर्चासत्रात बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथील प्रो. डॉ. आनंद मिश्रा यांनी प्राचीन भारतीय मूल्ये आधुनिक काळात कशी उपयुक्त ठरतात, यावर प्रकाश टाकला. तर वर्धा येथील डॉ. जयंत उपाध्याय यांनी जागतिक पातळीवरील नैतिक, पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांवर भारतीय तत्त्वज्ञानातून मिळणाऱ्या उपाययोजनांचे विश्लेषण केले. विविध वक्त्यांच्या मांडणीतून श्रोत्यांना भारतीय विचारधारेची व्यापकता आणि खोल अर्थ अनुभवला.
हे राष्ट्रीय चर्चासत्र ऑफलाईन तसेच ऑनलाईन अशा मिश्र स्वरूपात पार पडल्याने देशातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना या वैचारिक चर्चेत सहभागी होता आले. के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या विशेष प्रोत्साहनामुळे या चर्चासत्राचे आयोजन शक्य झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे आणि शैक्षणिक संचालक प्रो. डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांनी प्रास्ताविक केले .



