मुंबई-वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेला तीन दिवसांचा शासकीय दुखवटा विचारात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार, आता ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी १३ जानेवारी २०२६ रोजी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेणे आणि चिन्हांचे वाटप ही प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण झाली आहे. निवडणूक आता प्रत्यक्ष मतदानाच्या टप्प्यावर असतानाच २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने २८ ते ३० जानेवारी या कालावधीत राज्यात शासकीय दुखवटा जाहीर केला असून, या काळात सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. या कायदेशीर मर्यादेचे पालन करत आणि राज्यातील शोककुळ परिस्थितीचा विचार करून मतदानाची तारीख दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. या बदलामुळे आता प्रचाराची अधिकृत सांगता ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता होणार आहे.
मतदानानंतरची मतमोजणी प्रक्रिया ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित निवडणूक क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जातील. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या सुधारित कार्यक्रमाची अधिकृत सूचना ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.



