Home धर्म-समाज अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अंकुश चौधरी यांची नियुक्ती 

अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अंकुश चौधरी यांची नियुक्ती 


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संघटन विस्तारासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत जळगाव जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील सक्रिय तरुण कार्यकर्ते अंकुश राजेंद्र चौधरी (गुर्जर) यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील गुर्जर समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नितीन चौधरी (गुर्जर) यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली असून, जळगाव जिल्ह्यात संघटनेच्या विस्ताराची व बळकटीकरणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंकुश चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. युवक नेतृत्वाला संधी देत संघटनेने भविष्यकालीन वाटचालीसाठी ठोस दिशा निश्चित केल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे.

अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा ही संपूर्ण देशभरात गुर्जर समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी प्रभावी संघटना आहे. महाराष्ट्रातही महासभेचा विस्तार वेगाने होत असून, जळगावसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात तरुण, ऊर्जावान आणि कार्यक्षम नेतृत्व देण्याचा निर्णय संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

चांगदेव येथील रहिवासी असलेले अंकुश चौधरी हे सामाजिक कार्यात सक्रीय कुटुंबातून आले आहेत. ते सध्या बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत असून, चांगदेव येथील श्री. एस. बी. चौधरी हायस्कूल या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपदही ते भूषवत आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव संघटनेला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अंकुश चौधरी यांची ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, या काळात महासभेच्या नियम व ध्येयधोरणांनुसार संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात महासभेचे विचार पोहोचवणे, मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान राबवणे, तसेच गुर्जर समाजाला एका व्यासपीठावर आणून संघटन मजबूत करणे, ही प्रमुख उद्दिष्टे असतील.

याशिवाय, प्रतिवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला गुर्जर प्रतिहार सम्राट मिहीर भोज यांची जयंती ‘आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस’ म्हणून भव्य स्वरूपात साजरी करण्यावरही भर देण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकात्मता, अभिमान आणि सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना अंकुश चौधरी यांनी सांगितले की, “माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. समाजाच्या विकासासाठी आणि संघटनेच्या बळकटीकरणासाठी अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्या माध्यमातून सदैव तत्पर राहीन.” त्यांच्या या भूमिकेचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत होत आहे.


Protected Content

Play sound