
मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला अवघे 12 दिवस शिल्लक असतानाच बिनविरोध निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण 70 उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आले असले, तरी मुंबईसह राज्यातील सर्व बिनविरोध निवडींची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

निवडणुकीपूर्वी विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
केडीएमसीमध्ये भाजपचे 14 तर शिवसेना (शिंदे गट) चे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथेही किमान एक भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरातील तीन प्रभागांमध्ये काँग्रेस, जनता दल (एस) आणि आपच्या उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन स्वीकारले नाही, असा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाचीही चौकशी होणार आहे.
या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त तसेच वॉर्ड ‘ए’ कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत. नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी संपल्यानंतर उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. यानंतर संबंधित परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवले जाणार आहेत.
दरम्यान, बिनविरोध निवडणुकांमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून पक्षाचे तब्बल 45 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) ने 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आणत दुसरा क्रमांक पटकावला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 15 तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. जळगावातून भाजपचे 6 व शिवसेनेचे 6 असे एकूण १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचे उमेदवार बिनविरोध झाले, याची संपूर्ण यादीही आता समोर आली असून, निवडणूक आयोगाच्या चौकशीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



