यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींकडून निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर करांच्या थकबाकी वसुलीस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सरपंच परिषद मुंबईचे यावल तालुकाध्यक्ष संदीप प्रभाकर सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संदीप सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींकडून थकित निवासी मालमत्ता कर व अन्य करांवर ५० टक्के सवलत देण्यात आली होती. ही सवलत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू होती. मात्र, अभियानाच्या अंमलबजावणीत विविध तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक ग्रामपंचायतींना अपेक्षित कर वसुली करता आलेली नाही.

ग्रामपंचायतींचे आर्थिक स्वावलंबन हे समृद्ध गावांच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असून, कर वसुलीला अधिक वेळ मिळाल्यास ग्रामपंचायतींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. त्यामुळे थकबाकी वसुलीवरील सवलतीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी सरपंच परिषद यावल तालुकाध्यक्ष संदीप प्रभाकर सोनवणे, तालुका सचिव अजय अडकमोल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.



