
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावातील मुक्तेश्वर नगरात मुलगा व मुलीने पळून जावून लग्न केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात शिवीगाळ व हाणामारी झाल्याची घटना रविवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याबाबत सोमवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता परस्परविरोधात दोन्ही गटातील एकुण ११ जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नशिराबाद गावातील मुक्तेश्वर नगरात राहणाऱ्या मुलगा आणि मुलीने पळून जावून लग्न केले. या रागातून रविवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पहिल्या कुटुंबातील विवेक धनराज सरदारे, वैभवर सरदारे, अर्चना सरदारे, पद्मा सरदारे, ज्योत्सना सतिष गोरे आणि गुंजन (सर्वांचे पुर्ण नाव माहित नाही) आणि दुसऱ्या गटातील उषाबाई सोनवणे, आकाश सोनवणे, सोन भरत सोनवणे, प्रिया सोनवणे आणि स्वाती साळुंखे सर्व रा. मुक्तेश्वर नगर, नशिराबाद यांनी एकमेकांच्या घराजवळ येवून शिवीगाळ तसेच मारहाण करून एकमेकांना दुखापत केली. याप्रकरणी परस्पर विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून एकुण ११ जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे हे करीत आहे.



