भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नगरपालिका निवडणुकीसाठी सुरू असलेला उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया पाचव्या दिवशी शांततेत पार पडली. भुसावळ नगरपालिका आणि वरणगाव या दोन्ही ठिकाणी शुक्रवारी दिवसभर अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी निवडणूक शाखेत गर्दी केली होती. निवडणुका जवळ आल्याने दोन्ही शहरांत राजकीय वातावरण तापत असून नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
भुसावळ नगरपालिकेत शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी दहा असे मिळून एकूण अकरा अर्ज दाखल झाले. याआधी दाखल झालेल्या अर्जांसह भुसावळमध्ये आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदांसाठी मिळून एकूण १५ अर्ज दाखल झालेले आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांनी अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरळीत व नियमानुसार पार पाडली.

वरणगाव नगरपालिकेतही पाचव्या दिवशी अर्ज दाखल करण्यास चांगला प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी येथे २१ अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण २९ अर्जांच्या नोंदी झाल्या आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्जांचा समावेश आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांच्या उपस्थितीत निवडणूक विभागाचे कामकाज शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आले.
आगामी काही दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी रणांगणात उतरण्याची शक्यता असून, त्यामुळे राजकीय घडामोडींना आणखी वेग येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरांमधील सर्वच पक्षांनी आपली रणनीती अंतिम टप्प्यात नेली असून, स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, वाढत्या घडामोडींमुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढत असून, कोणते नवे चेहरे समोर येतील आणि कोणती आघाडी मजबूत होईल याबाबत चर्चा रंगल्या आहेत. निवडणुकीचा माहौल दिवसेंदिवस चैतन्यपूर्ण होताना दिसत आहे.



