जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या काही महिन्यांत अंतराळ संशोधनासाठी उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे होणार आहेत. या उड्डाणांदरम्यान हैदराबादपासून सुमारे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत उपकरणे पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैदराबाद-५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण १० बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. १९५९ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ही वैज्ञानिक उड्डाणे सातत्याने होत आहेत. यंदाही त्याच परंपरेत संशोधनासाठी हे प्रयोग पार पडणार असून, सर्व तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात आहे.

या बलूनचे वैशिष्ट्य असे की, ते हायड्रोजन वायूने भरलेले असून त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटरपर्यंत असतो. हे बलून सुमारे ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे घेऊन जातात. काही तासांच्या प्रयोगानंतर ही उपकरणे रंगीत पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितपणे जमिनीवर उतरतात. या उपकरणांमधून मिळणारे डेटा अंतराळातील किरणोत्सर्ग, वातावरणातील बदल आणि विविध भौतिक प्रयोगांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असतात.
वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे हैदराबादपासून २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर पडू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपूर, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत उपकरणे उतरू शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत की, अशा उपकरणे किंवा पॅराशूट आढळल्यास त्यांना उघडू किंवा हलवू नये. कारण काही उपकरणांमध्ये उच्च विद्युत दाब (हाय व्होल्टेज) असू शकतो तसेच छेडछाड झाल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होण्याचा धोका असतो. अशा वस्तू आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच संचालक, बलून सुविधा केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ईसीआयएल, हैदराबाद यांच्याशी थेट फोन किंवा संदेशाद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपकरणांची सुरक्षित परतफेड करणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस तसेच झालेला खर्च परत दिला जाईल, मात्र उपकरणांशी छेडछाड झाल्यास बक्षीस दिले जाणार नाही. स्थानिक प्रशासनाने ही माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवावी आणि स्थानिक भाषेत जनजागृती मोहिम राबवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या बलून उड्डाणासाठी ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात सर्व तयारी पूर्ण करण्यात येणार असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, हैदराबाद यांनी स्पष्ट केले आहे.



