बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना मारण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले असून सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
बच्चू कडू म्हणाले की, “दररोज १२ ते १३ शेतकरी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला काहीही वाटत नाही. अशावेळी एखादा आमदार मारला गेला तर काय बिघडते? किमान शेतकऱ्यांना आत्महत्येचा विचार तरी करावा लागणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याने संतापाची लाट उसळली असून अनेक राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे.

बच्चू कडू पुढे म्हणाले की, “आज शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव फक्त तीन हजार रुपये मिळत आहे. अद्याप एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. सरकारने हमी भावावर २० टक्के बोनस देण्याचे आश्वासन दिले होते, पण आजवर ते आश्वासन फसले आहे.” त्यांनी संभाजी महाराजांचा उल्लेख करत म्हटले की, “संभाजी महाराज शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढले, पण आजचे नेते त्यांच्या संघर्षाचा विसर पाडतात.”
भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, “दरेकर यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते आक्रस्ताळे वक्तव्य करत आहेत. त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांची दुर्दशा पाहावी. ते पक्षाच्या जोखडाखाली जगणारे आहेत, जनतेशी त्यांना काही देणंघेणं नाही.”
नितेश राणेंवर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, “ते हिंदुत्वाबद्दल बोलतात आणि नंतर राजस्थानात पूजा करायला जातात. त्यांना शेतीबद्दल काहीही माहिती नाही. त्यांची मालमत्ता आणि पद हे वडिलांच्या वारशामुळे आहे; शेतकऱ्यांचा आदर ते काय करतील?”
त्याचबरोबर त्यांनी भोपाळच्या माजी खासदार प्रज्ञा साध्वी यांच्या “प्रेम जिहाद”संदर्भातील विधानावर प्रतिक्रिया देत म्हटले, “हातपाय तोडण्याबद्दल बोलणे हा हिंदू धर्म नाही. प्रेम हे स्वेच्छेने होत असते आणि ते आंधळे असते. समाजात फूट पाडण्यासाठी अशा विधाने केली जातात.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतभेदांवरही कडूंनी टोला लगावला. त्यांनी म्हटले की, “दोघांमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे आणि त्याचा फटका राज्याच्या राजकारणाला बसत आहे.”
एकंदरीत, बच्चू कडू यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली असून विरोधकांसह सत्ताधारी गटाकडूनही तीव्र टीका होत आहे. या विधानाचा पुढील राजकीय परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



