
मानेगाव हे मुक्ताईनगर तालुक्यातील एक महत्वाचे गाव असून येथे जाणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब स्थितीत आहे. विशेषतः मानेगाव फाटा ते बजरंग बली मंदिरपर्यंतचा रस्ता संपूर्णपणे उखडलेला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरून वाहतुकीस अत्यंत अडथळे येत असून शाळकरी मुले, वृद्ध नागरिक, महिला आणि दुचाकीचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामपंचायत मानेगावच्या वतीने ९ जुलै २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ठेकेदाराने मंजूर काम सुरू न केल्याचा आरोप करत १५ दिवसांच्या आत रस्ता पूर्ण करून देण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत समिती आमरण उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन काम सुरू करण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामस्थांचा आरोप आहे की या रस्त्याची पर्यायी व्यवस्था सुद्धा अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे गंभीर अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासी आणि वाहनधारकांसाठी हा रस्ता चालणे किंवा प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे अधिक विलंब न करता ठेकेदारावर कारवाई करावी व काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा प्रशासनाला सामुदायिक आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशारा सरपंच यांनी दिला आहे.



