जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे ओला दुष्काळ व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रा. सुकलाल पाटील यांनी अमळनेरचे तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या होत्या.

१. जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी मंडळांमध्ये सरासरी पेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत मिळणे बाबत.
२. कापूस व सोयाबीन अनुदानात इ-पीक पेरा न केलेल्या पण, उताऱ्यावर पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणे बाबत.
३. अमळनेर येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झाले असुनही भरपाई मिळाली नाही.
४. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या टाटा ईशा कंपनीच्या बोगस कापसाच्या बियाण्या मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणे बाबत.
५. रब्बी हंगाम २०२३-२४ च्या ऑनलाईन तक्रार केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्यावा.

सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत त्यांना पोहचवावी हि आपणास नम्रपूर्ण विनंती. विषय क्र.२ नुसार, शासनाने घोषित केलेल्या कापूस व सोयाबीन अनुदानातून इ-पीक पेरा नसलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे. तरी या शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन अनुदान यादीत नाव आलेले नाही. आपण लवकरात लवकर याची नोंद घ्यावी व या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अमळनेर तालुक्यात ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली होती, नुकसानीचे पंचनामेही झाले. मागील तीन वर्षांपासून शासन दरबारी निवेदने व आंदोलन करून देखील शेतकऱ्यांची हक्काची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही तरी याची आपण लवकरात लवकर दखल घेऊन नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करावी. तालुक्यातील ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन टाटा इशा कंपनीच्या कापू बियाण्या अंतर्गत लागवड केलेली आहे. १२० दिवस झाले तरी पिकाला कोणतेही फळ नाही. तरी याची तात्काळ दखल घेऊन संबन्धित कंपनीवर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये अनेक वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या पोर्टल वर ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहेत तरी त्या शेतकऱ्यांना तात्काळ विम्याची रक्कम वर्ग करण्यात यावी.

Protected Content