पाडळसे धरणाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गेल्या २५ वर्षांपासून रखडले आहे, ते पुर्ण व्हावे यासाठी पाडळसे धरण आंदोलन समिती सातत्याने संघर्ष करीत आहेत. मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री तसेच दोघे उपमुख्यमंत्री हे अमळनेर येथे येत असताना सदर प्रश्नाबाबत निम्न तापी प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी धरण समितीने केलेल्या आंदोलनामुळे दाखल गुन्ह्यातून शासन सुटका करण्याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे समिती व जनतेचे लक्ष राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले ना. देवेंद्र फडणवीस यांना धरणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सदर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळे झेंडे दाखवले होते. धरण आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, शिवाजीराव पाटील रणजित शिंदे, देविदास देसले, सुनिल पाटील यांचेसह धरण समितीच्या पदाधिकारी यांचेवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. समितीची पदाधिकारी व कार्यकर्ते आजही सदर गुन्हे अंतर्गत न्यायालयात सुनावणीसाठी नियमित उपस्थित होत असतात. मात्र शासनकर्त्यांनी या अराजकीय लढ्यातील या गुन्ह्यातून समिती सदस्यांना अजूनही वगळलेले नाही. पाडळसे समिती आजही धरणाच्या प्रश्नाबाबत सातत्याने पाठपुरावा करत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धरण प्रश्न हा राजकीय दृष्ट्या केंद्रस्थानी राहील यादृष्टीने समिती तसेच विरोधी उमेदवार यांच्या तर्फे जन् जाग्रुती होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मागील काळात समितीच्या वतीने ५२ हजार ५०० पत्र अमळनेरच्या शेतकऱ्यांनी व जनतेने या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी पाठविलेले होते. अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व राज्याचे गृह तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे समितीसह सहा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

Protected Content