पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या तीन दिवसांपासून पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी, मका, कापुस, केळी सह विविध पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असुन याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी तसे आदेश संबंधितांना दिले आहेत.
३३ टक्क्यांच्या आत अथवा ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असे सरसकट पंचनामे केले जाणार असून लवकरच झालेल्या पंचनाम्यांचा अहवाल उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ अहवाल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी १२ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, प्रविण ब्राह्मणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.
पाचोरा तालुक्यासह भडगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावुन रितसर पंचनामे करण्यात यावे असे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी संबंधितांना दिले आहेत. ३३ टक्क्यांच्या आत अथवा ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असे सरसकट पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पाठविण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.


