जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या भांडवलशाही धोरणाविरोधात विविध कामगार संघटनानी कालपासून संप पुकारला आहे. यानुसार आज दुसऱ्या दिवशी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनसह विविध कामगार संघटनांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करून त्यांना कवडीमोल भावाने कॉर्पोरेटसच्या झोळीत टाकले जात असल्याचा आरोप यावेळी संघटनाकडून करण्यात आला.
शहरातील बळीराम पेठ येथील कम्युनिस्ट पक्ष कार्याला येथून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. हा मोर्चा टॉवर चौक, छत्रपती शिवजी महाराज चौक, कोर्ट चौक, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, बँक कर्मचारी संघटना, एलआयसी कर्मचारी संघटना, रेल्वे कर्मचारी संघटना, मॅकेनिकल युनियन, आशा-गट प्रवर्तक, बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन यासह विविध केंद्रीय कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी या संघटनांकडून घोषणाबाजी करण्यात येऊन श्रमसंहिता रद्द करा, कामगारांच्या बाजूचे सर्व कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करून त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व शासकीय विभागांचे करण्यात येणारे खाजगीकरण रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1660775314277905
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/671748517403714