Home प्रशासन जिल्हा परिषद आता तालुक्याच्या ठिकाणी दर ३ महिन्यांनी सरपंच सभा

आता तालुक्याच्या ठिकाणी दर ३ महिन्यांनी सरपंच सभा

0
31


 

मुंबई: वृटत्तसंस्था । ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

 

पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत या सभांचं आयोजन केलं जाणार असल्याचंही त्यांनी  स्पष्ट केलं.  ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याबाबत तक्रारी, निवेदने शासनास प्राप्त होत असतात. याबाबी विचारात घेऊन राज्यात सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सरपंच सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सभेत संबंधित विस्तार अधिकारी (पंचायत) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी, ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी, गार्‍हाणी, अडचणींची सोडवणूक करावी. ही सभा दर ३ महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी व ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याच दिवशी या सभेचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

 

गटविकास अधिकाऱ्यांनी सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अहवाल एकत्र करून ते संबंधित विभागीय आयुक्त यांना सात दिवसात तर त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातून आलेले अनुपालन अहवाल शासनास दहा दिवसात सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अहवालाची शासन स्तरावर दखल घेण्यात येईल. सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून गावांमधील नागरी समस्यांची सोडवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केलं आहे


Protected Content

Play sound