Home धर्म-समाज यमाला टाळायचे तर नियम आणि संयम हवा-मुख्यमंत्री

यमाला टाळायचे तर नियम आणि संयम हवा-मुख्यमंत्री


मुंबई प्रतिनिधी । जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ करतांना ते बोलत होते.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्धाटन केले. याप्रसंगी ठाकरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्र रस्ते अपघातात दुसर्‍या क्रमांकावर आहे. मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे. मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे. रस्ते सुरक्षा हा सप्ताह, महिना यापुरता मर्यादित न राहता ही जीवनशैली व्हावी. नियम आणि संयम या दोन्ही शब्दात यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, रस्ते फक्त माणसचं क्रॉस करत नाहीत तर प्राणी ही करतात. त्यांची ही काळजी घ्यायला हवी. नवीन तंत्रज्ञान, नवीन वेगाच्या गाड्या येत आहेत. त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना धन्यवाद! ते अपघात होऊ नयेत म्हणून जनजागृतीचे महत्वाचे काम करत आहेत. रस्ते नियम पळताना ज्या सोयी सुविधा असतात त्यात सहजता हवी. त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


Protected Content

Play sound