मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात तब्बल ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’ उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या ट्रॅफिक गार्डन्ससाठी सुमारे एक एकर जागा निश्चित करण्यात येणार असून प्रत्येक उद्यानासाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. उद्यानांमध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम शिकवले जाणार आहेत.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती होण्यास मदत होईल. “भविष्यात जबाबदार वाहनचालक घडवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्यानांमध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी विशेष ‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शाळांतील विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी वेळेनुसार प्रवेश व्यवस्था केली जाणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश. उद्यानांमध्ये देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जातींची लागवड करण्यात येणार असून त्या वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व दर्शवणारी माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या नियमांसोबतच पर्यावरण संरक्षणाचे धडेही मिळणार आहेत.
याशिवाय भविष्यातील ई-वाहनांची प्रतिकृती आणि त्यासंबंधित माहितीही या ट्रॅफिक गार्डन्समध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे ही उद्याने अबालवृद्धांसाठी ज्ञान, शिक्षण आणि विरंगुळ्याचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे.
राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून सुरक्षित आणि जबाबदार वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक मोठे पाऊल टाकणार असल्याची भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.



