
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजातील जातीय भेदभाव कमी करून सामाजिक सलोखा आणि समतेची भावना दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र जोडप्यांना ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत असून आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुणांना शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

समाजात जात-पात, भेदभाव आणि सामाजिक विषमता कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य देऊन सामाजिक एकात्मता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेअंतर्गत मंजूर होणारी ५० हजार रुपयांची रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त नावाने दिली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त-भटक्या जाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तर दुसरी व्यक्ती हिंदू, जैन, लिंगायत किंवा शीख या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या आंतरजातीय विवाहांना शासनाच्या या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळू शकते.
या योजनेसाठी इच्छुक जोडप्यांनी संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेबाबत सविस्तर माहिती जिल्हा समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरही या योजनेबाबत माहिती उपलब्ध आहे.
राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे समाजात समतेची भावना बळकट होण्यास मदत होत असून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळत आहे. सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी अशा योजनांचे महत्त्व मोठे असल्याचे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.
या योजनेविषयी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाने केले आहे.



