
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा शिवारातून शेत गट क्रमांक १९ मधील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून ८८ हजार रुपये किमतीच्या २० लहान-मोठ्या बकऱ्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली असून, या संदर्भात मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलींद गोकूळ कंखरे (वय २७) यांच्या मालकीच्या या बकऱ्या होत्या. कंखरे यांनी आपल्या शेतातील गोट्यात या बकऱ्या पाळल्या होत्या. मात्र, चोरट्यांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या गोट्यातून २० लहान-मोठ्या बकऱ्या चोरून नेल्या. या घटनेमुळे कंखरे यांना सुमारे ८८ हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यासाठी हे नुकसान फार मोठे आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर कंखरे यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. प्राथमिक चौकशीनंतर अखेर मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ श्रीकांत बदर हे करीत आहे.



