…हा तर मोदी सरकारचा केवळ एक ‘इव्हेंट’ !: अतुल लोंढे यांची टिका  

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रातील मोदी सरकारने आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे देण्याचा प्रकार हा केवळ एक इव्हेंट असल्याची टीका प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, मेगा इव्हेंट करण्यात नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचा कोणी हात धरू शकत नाही. स्टाफ सिलेक्शन, रेल्वे भरती बोर्ड, पोस्ट यासह विविध बोर्डाच्या परीक्षा होऊन दीड वर्ष झाली पण विविध परीक्षा बोर्डानी घेतलेल्या परीक्षांचे निकाल थांबवून पंतप्रधानांना दिवाळीचा इव्हेंट करता यावा म्हणून ही भरती थांबवली. आता हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत तर गुजरातच्या निवडणुकाही लवकरच होत आहेत. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आता नियुक्तीपत्र देण्याचा घाट घातला आहेत. श्रम पोर्टलवर २२ कोटी तरुणांनी नोकरी व रोजगारासाठी नोंदणी केली आहे त्यातील फक्त ७ लाख लोकांना नोकरी मिळाली आहे. केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या २५ लाख जागा रिक्त आहेत. उपलब्ध नोकर्‍या, नोकरी मागणार्‍यांची संख्या व बेरोजगारीचा उच्चांक पाहता ७५ हजार नोकर्‍या म्हणजे ‘उंट के मुंह में जिरा’ असेच म्हणावे लागले.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री असताना ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात ते ७२ लोकांनाही नोकर्‍या देऊ शकले नाहीत. फडणवीसांनी नोकर भरती केली नाही तर वेगळीच भरती केली. दुसर्‍या पक्षातील आमदार, खासदारांची भाजपामध्ये भरती केली. मोदी आणि फडणवीस म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी’ अशी प्रखर टीका अतुल लोंढे यांनी याप्रसंगी केली.

Protected Content