हतबल मुख्यमंत्री म्हणत भाजपची टीका

 

मुबई : वृत्तसंस्था । आता भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, “हतबल मुख्यमंत्री” असं संबोधत मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे विविध ट्विट देखील भाजपाकडून करण्यात आलेले आहेत.

 

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन संदर्भात दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं विधान केलं.तसेच, अन्य देशांनी घेतलेल्या निर्णयाची व तेथील करोना परिस्थितीची देखील माहिती देत, राज्यातील परिस्थितीशी तुलना केली.

 

“लॉकडाउनला अजून वेळ आहे की, तो पर्यायच नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? लॉकडाउन करायचा की नाही, याबाबत तुम्ही दोन दिवसांत ठरवताय. या दोन दिवसांतच हातावर पोट असलेल्यांनी कसं जगायचं, हे सुद्धा ठरवा आणि त्यांना दिलासा द्या …!” असं भाजपाने म्हटलं आहे.

 

 

“स्वतःच ठेवायचं झाकून आणि… अशी गत झालीये तुमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे. स्वतःच्या राज्यात इतका हाहाकार माजलेला असताना, तुम्ही दुसऱ्या देशांनी काय केलं, ते काय करताहेत याची माहिती जनतेला कशासाठी वाचून दाखवताय?” असा सवाल देखील भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेला आहे.

 

“आधी कोरोना युद्धात स्वेच्छेने सहभागी झालेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काय मिळालं? मग डॉक्टर कुठून आणायचे? हा प्रश्न तुम्हाला पडणारच ठाकरेसाहेब. पुन्हा लढण्यासाठी डॉक्टर-वैद्यकीय कर्मचारी स्वतःहून पुढे का येत नाहीत? असा प्रश्न तुम्हाला पडत नाहीये का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?” असे प्रश्न विचारत भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे.

Protected Content